
तासगावात पुण्यतिथी सोहळा उत्साहात
सांगली/तासगाव : वीर शिवा काशीद यांच्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेता, त्यांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. त्यांच्या कार्याला योग्य तो सन्मान मिळेल.शिवा काशीद यांचा उल्लेख आदराने शिवाजी काशीद असा व्हावा. त्यांची पुण्यतिथी गावोगावी सार्वजनिक साजरी व्हावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते प्रदीप (काका) माने – पाटील यांनी केले. तासगाव येथील जिवा शिवा सेना प्रतिष्ठान व संत सेना सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विररत्न शिवा काशीद यांच्या ३६५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. युवा व्याख्याते विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष अजय पवार , प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव , संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष रोहित गायकवाड प्रमुख उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तासगाव शहरातून संत सेना मंदिरापर्यंत वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिवसेनेचे नेते प्रदीप माने-पाटील व माजी नगराध्यक्षा सिंधुताई वैद्य यांच्याहस्ते प्रतिमपूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विक्रांत पाटील म्हणाले, शिवा काशीद यांचा पन्हाळगडावरील पराक्रम हा केवळ एक धाडसी प्रयत्न नव्हता. तर या घटनेने स्वराज्याचा आधारस्तंभ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन आयुष्य दिले. जर शिवाजी महाराज सुरक्षित बाहेर पडले नसते, तर स्वराज्याची पुढील वाटचाल कदाचित वेगळी असती. कार्यक्रमास वैजयंता फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती संजयकाका पाटील, जि. प. माजी सदस्या स्नेहल पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय चव्हाण, काँग्रेसचे डॉ.विवेक गुरव, रामोशी बेडर समाजाचे राज्याध्यक्ष अंकुश जाधव, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मंडले, शिवसेना नेते रवींद्र साळुंखे, वैद्य गुरुजी, पुरम मलमे ,उदय राजोपाध्ये ,आनंदा धनवडे , राहुल माने यांच्यासह विविध राजकिय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रोहित गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सुमित माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास जीवा शिवा सेना प्रतिष्ठान मधील सर्व संचालक मंडळ व संत सेना सेवा संघ तासगाव मधील संचालक तसेच तासगाव तालुक्यातील व तासगाव शहरांमधील सर्व समाज बांधव आदी उपस्थित होते.